कुशीनगर : उत्तरप्रदेशच्या कुशीनगर येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास 13 महिला विहिरीत पडल्याची घटना घडली. यात 11 महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. नौरंगिया शाळेच्या मैदानात एका लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. बुधवारी या ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. काही महिला आणि मुली विहिरीवर लावलेल्या जाळीवर उभ्या होत्या. त्याचवेळी हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि काही महिला जाळीवर चढल्याने महिलांच्या वजनाने लोखंडी पातळ जाळी तुटली. त्यामुळे या जाळीवर उभ्या असलेल्या सर्व महिला एकापाठोपाठ एक करून विहिरीत कोसळल्या. या घटनेत आतापर्यंत अकार महिलांचा मृत्यू झाला आहे.
विहिरीतून महिलांचा किंचाळण्याचा आवाज येते होता. तर पाण्याने भरलेल्या विहिरीत जीव वाचवण्यासाठी काही महिला शेवटची धडपड करताना दिसत होत्या. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आणि स्थानिकांनी या महिलांना पाण्यातून बाहेर काढेपर्यंत 11 महिलांचा बुडून मृत्यू झाला. तर दोन महिलांचा जीव वाचला आहे.