मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मैदानात उतरुन नव्याने पक्षउभारणीला सुरुवात केली. मात्र, तरी देखील ठाकरे गटातील आऊटगोईंग काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. तब्बल ३० वर्षाहून अधिक काळ ठाकरेंसोबत एकनिष्ठ असलेल्या शिवसैनिकाने अखेर शिवसेनाला जय महाराष्ट्र केला आहे.
कोपरगाव शहरातील ठाकरे गटाच्या शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. जाधव यांनी शेकडो कार्यकर्त्यासह बीआरएस पक्षात प्रवेश केलाय. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला.
राज्यातील आघाडी आणि महायुतीच्या राजकरणात शिवसैनिकाला न्याय मिळणे अवघड असून प्रस्थापितांना मदत करण्याशिवाय पर्याय राहिला नाही, अशी भावना बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केली. शेतकरी प्रश्नासह तालुक्यातील सर्व प्रश्नांसाठी वज्रमूठ बांधून लोकांच्या न्याय हक्कासाठी भारत राष्ट्र समिती पक्ष पूर्णपणे ताकतीने कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभा राहणार असल्याचं जाधव म्हणाले.
त्याचबरोबर कोपरगाव तालुक्यातील जनतेला तिसरा पर्याय देणार असल्याचे जाधव यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं आहे. श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या प्रवेशा नंतर ठाकरे गटाचे जाधव यांनी सुद्धा BRS मध्ये प्रवेश केला असून आगामी शिर्डी लोकसभा मतदार संघातील निवडणूक अधिक रंगतदार होईल असे चित्र निर्माण झालं आहे.