Wednesday, May 14, 2025

विहिरीचे खोदकाम सुरू असताना जिलेटीनचा भीषण स्फोट; श्रीगोंद्यातील ३ कामगारांचा जागीच मृत्यू

विहिरीचे खोदकाम सुरू असताना जिलेटीनच्या कांड्याचा स्फोट होऊन तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. गणेश वाळुंज ,नागनाथ गावडे, सूरज इनामदार अशी मृत मजुरांची नावे आहेत. या घटनेत दोघे जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील टाकळीकडेवळी येथे शनिवारी विहिरीचे काम सुरू होते. खोदकामात खडक लागल्यामुळे मजुरांनी जिलेटीनच्या कांड्या लावून ब्लास्टिंग घेण्याचे ठरवले.

यावेळी मजुरांनी विहिरीत जिलेटीनच्या कांड्या लावल्या. मात्र मजूर बाहेर येण्याआधीच या कांड्यांचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की विहिरीत असणारे चारही कामगार बाहेर फेकले गेले. यात घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले.दरम्यान, जिलेटीनचा ब्लास्ट झाल्याची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मजुरांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मयतापैकी एक जण बारडगाव येथील तर दोघे जण टाकळी गावातील रहिवासी असल्याचं समजतंय. या दुर्दैवी घटनेमुळे टाकळी गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या जिलेटीनच्या कांड्या आल्या कोठून, त्यासाठी परवानगी घेतली होती का, विहिरीत काम करणारे कामगार प्रशिक्षित होते का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधावी लागणार आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles