मुंबईत ॲड. उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीचे ‘निर्भय बनो’चे असीम सरोदे यांनी उपरोधिक स्वागत केले आहे. ॲड. उज्ज्वल निकम सर तुमचे जनतेच्या न्यायालयात स्वागत! या न्यायालयात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असतो, इथे मनं जिंकावी लागतात आणि लोकांची त्वरित येणारी प्रतिक्रिया ‘जेव्हढे विचारले तेवढेच बोला’ असे म्हणून थांबविणे लोकांच्या न्यायालयात चालत नाही, असा टोला त्यांनी निकम यांना लगावला आहे. आपण अनेक खटल्यांत गुन्हेगारांना शिक्षा देण्यात यश मिळवले. जरी कुणी अजून तशी माहिती दिलेली नाही, तरी पण काहीही फी न घेता गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठीसुद्धा तुम्ही काम केले असेल असे समजू, असेही खोचकपणे त्यांनी निकमांना सुनावले आहे.
सर तुम्हाला माहिती आहे की, आता लोकांशी संवाद साधतांना गोलमोल, गुळमुळीत बोलून चालणार नाही. लोकांनी मोदींचा खोटेपणा आता कुठे ओळखला आणि तरीही, तुम्ही त्यांच्यात सामील झालात, असा सवाल ॲड सरोदेंनी निकमांना केला आहे.
सर, अनेकदा तुम्ही केसची कागदपत्रे, चार्जशीट बघून हरणारी केस घेणे नाकारले आहे. मोदींचा नाकर्तेपणा, धर्मांधता, वाढती महागाई, भ्रष्टाचारी, लोकशाहीविरोधी आता लोकांनी स्पष्टपणे ओळखले आहे. या वेळी मोदींना हरवायचे असा चंग लोकांनी बांधला आहे, तेव्हा ही हरणारी केस आपण का घेतली, याचे अनेकांना आश्चर्य वाटत आहे.