नगर, (अहिल्यादेवीनगर)ः राज्यात तीसपेक्षा अधिक लोकसभा मतदार संघात धनगर समाजाची ताकद आहे. मात्र सध्या लोकसभेच्या जागावाटपाचा विचार करता धनगर समाजाला एकाही लोकसभा मतदार संघात स्थान दिल्याचे दिसत नाही. सरकारने धनगर समाजाच्या तोंडाला आरक्षणाबाबत पानेच पुसली आहेत. आता लोकप्रतिनिधी म्हणूनही संधी देण्याएवजी डावलले जात आहे. त्यामुळे धनगर समाजाचा अधिक प्रभाव असलेल्या राज्यातील पंधरा लोकसभा मतदार संघात यशवंत सेना उमेदवार उभे करणार असून उमेदवाराच्या नावाची लवकर घोषणा करणार असल्याचे यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले. यशवंत सेनेच्या या भूमिकेमुळे राज्यातील भाजपसह सर्वच राजकीय पक्षांची मोठी अडचण होणार आहे
नगर ( अहिल्यादेवीनगर) येथे आज (रविवारी) यशवंत सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. धनगर समाजाच्या आरक्षणासह अन्य प्रश्नावर राज्यभर लढा देणाऱ्या आणि समाजात अधिक प्रभाव असलेल्या यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी ‘ॲग्रोवन’ शी संवाद साधत लोकसभा निवडणूक लढवण्याच्या पाश्वभूमीवर माहिती दिली. बाळासाहेब दोडतले म्हणाले, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा यासाठी आम्ही राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी पहिल्यांदा २१ दिवस उपोषण केले. अश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेतले. सरकारने दिलेली मुदत संपल्यावर पुन्हा उपोषण केले. मात्र आरक्षण देण्याबाबत दोन वेळा सरकारकडून शब्द देऊनही शेवटी फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकतर सरकारने धनगर समाजाला दिलेला शब्द पाळला नाही, आरक्षण दिले नाही. शिवाय लोकसभा निवडणूकीत राज्यातील ४८ मतदार संघात कोणत्याही पक्षाने धनगर समजाला प्रतिनिधीत्व अजून दिलेले नाही. आता देतील याचीही शश्वती दिसत नाही. राज्यातील दोन्ही राजघराण्यातील व्यक्तीला संधी दिली जात असताना धनगर समाजही राजे होते. तीसपेक्षा अधिक लोकसभा मतदार संघात प्रभाव असतानाही धनगर समाजाला जाणीवपुर्वक डावलले जात असल्याचे स्पष्ट झाले असल्याने आता धनगर समाजाचा अधिर प्रभाव असलेल्या नगर, शिर्डी, नाशिक, माढा, सोलापुर, सांगली, बारामती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, यवतमाळ, सातारा, व जालना या पंधरा मतदार संघात धनगरसेना आपले उमेदवार उभे करणार आहे. राम शिंदे हे माजी पालकमंत्री, विद्यमान आमदार आहेत. त्यांचा प्रभावी कामांमुळे नगर जिल्ह्यात प्रभाव आहे. ते जिंकणारे उमेदवार असल्याने गेल्या अनेक दिवसापासून त्यांना नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून भाजपने उमेदवार द्यावी अशी मागणी आहे. मात्र त्याबाबत गांभिर्याने विचार केला नाही. त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती असे बाळासाहेब दोडतले म्हणाले. दोडतले यांच्या या भूमिकेने राज्यात अनेक राजकीय पक्षांची मोठी अडचण होणार आहे. माणिक दांगडे पाटील, अण्णासाहेब रुपनवर, दादासाहेब केसकर, गोविंद नरवटे, नितीन धायगुडे, गंगाधर कोळेकर, लक्ष्मण कोकरे, दत्ता काळे, गुजर, बाळासाहेब कोरके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.