अत्यंत वाईट अवस्थेत असलेल्या व अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आहिल्यानगर मनमाड रस्त्याची दखल आपण घेतली असून त्यासाठी आगामी आठ दिवसांत अधिकार्यांची बैठक घेऊन त्यावर मार्ग काढू. त्यासाठी 2 हजार 500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली जाईल ,अशी माहिती केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रश्नास उत्तर देताना संसदेत दिली आहे.
गडकरी म्हणाले, आता आम्ही या रस्त्याचा प्रश्न गांभीर्यानं घेतला असून या मार्गावर साईभक्तांची ये-जा असते आणि तो रस्ता खराब असल्याने आम्हाला त्यांचा मोठा संकोच वाटत असून त्यासाठी आम्ही आता एक अल्पकालावधी निविदा जारी केली असून त्यासाठी 2 हजार 500 कोटींची निविदा बोलावली आहे. त्यातून सदर काम निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन दोन महिन्यांत सुरू होईल असा विश्वास खा.वाकचौरे यांना दिला आहे. यापूर्वी या रस्त्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले त्यातील तीन ठेकेदार पळून गेले आहे. निविदा काढल्या की त्यातील अनेक ठेकेदार ती प्रक्रिया लवचिक असल्याने जवळपास 30-50 टक्के न्यूनतम पातळीवर भरतात. मात्र ते काम पूर्णत्वास नेत नाही आणि मध्येच पळून जात आहे हे खरे आहे.
आम्ही नवीन ठेकेदारांना संधी मिळावी व त्यांच्यातून नवीन चांगले ठेकेदार जन्मास यावे अशी रास्त अपेक्षा केली असताना त्यांचे परिणाम दुर्दैवाने वाईट हाती आले असून त्यातून फायदा होण्याऐवजी तोटा झाला आहे. त्यात आता आम्ही सुधारणा करत आहोत. आता दोन ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत. मात्र त्यातच पुन्हा तीच स्थिती उद्भवली असून त्यावर आपण पुन्हा अधिकार्यांना योग्य सूचना केल्या आहेत. तो पर्यंत रस्त्याची डागडुजी करण्यासाठी आपण मलमपट्टी करण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतर सदर रस्ता खा.वाकचौरे यांच्या सूचनेप्रमाणे काँक्रीटीकरण करून केला जाईल असा विश्वास दिला आहे.