अहिल्यानगर-मालमत्ता कर व पाणीपट्टी न भरणार्या थकबाकीदारांवर कारवाई होत नसल्याने महापालिकेच्या कराच्या थकबाकीत वाढ झाली आहे. चालू वर्षात अवघी 20.22 टक्के म्हणजे 48.51 कोटी रुपये वसुली झाली आहे. त्यामुळे कराची थकबाकी 215 कोटींवर पोहचली आहे. परिणामी, शहरात विकासकामांसाठी निधी उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
चालू आर्थिक वर्षात महापालिकेची कराची मागणी 60.63 कोटी रूपये असून 202.98 कोटी रूपयांची जुनी थकबाकी आहे.
त्यामुळे थकबाकी 263.52 कोटींवर पोहचली. चालू वर्षात केवळ 48.51 कोटींची वसुली झाली आहे. यात 21.16 कोटी रूपये थकीत रक्कम व 27.30 कोटी रूपये चालू वर्षाच्या मागणीची रक्कम आहे. महापालिका थकबाकीदारांवर कोणतीही कारवाई करत नसल्याने नियमित कर भरणार्यांची संख्याही घटत आहे. चालू वर्षात निम्म्याच मालमत्ताधारकांनी कर भरला आहे.
दरम्यान, महापालिकेची वसुली मोहिम ठप्प असल्याने त्याचा थेट परिणाम विकासकामांवर झाला आहे. नवीन विकास कामांसाठी निधी उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच, शहरात 150 कोटींची रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यात सुमारे 45 कोटी रूपये मनपाला स्वहिस्सा भरावा लागणार आहे. मात्र, वसुलीच होत नसल्याने महापालिका आर्थिक अडचणीत सापडली आहे.