मनपा प्रशासनाने आता छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत जनहिताचा ‘प्रामाणिक’ आणि ‘भ्रष्टाचार मुक्त’ कारभार करावा, अभिषेक कळमकर यांची अपेक्षा
नगर: अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण नुकतेच करण्यात आले आहे. नगरमधील तमाम शिवप्रेमींनी पुतळा अनावरणाचे स्वागत केले आहे. मात्र महापालिकेचा मागील काही वर्षातील एकूणच कारभार पाहता प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असा जनहिताचा भ्रष्टाचार मुक्त आणि प्रामाणिक कारभार करावा अशी अपेक्षा आहे. नवीन वर्षात मनपात प्रशासक राज असणार आहे. या काळात अधिकाऱ्यांना आपली कर्तव्य दक्षता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. याचबरोबर प्रोफेसर कॉलनी चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे कामही जलदगतीने पूर्ण करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कळमकर यांनी म्हटले आहे की, नगर महापालिका मुख्यालयाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विराजमान झाला आहे. त्यांच्या पासून सामान्य शिवप्रेमी प्रेरणा घेईलच.त्याचबरोबर मनपा प्रशासनाने देखील प्रेरणा घेणे अपेक्षित आहे. तरच पुतळा उभारणीचा उद्देश सफल होईल. नगर शहरात विविध समस्यांचा पाढा मोठा आहे. त्यांची सोडवणूक करण्याची गरज आहे. एक जानेवारी पासून लोकनियुक्त नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. परिणामी आता मनपाचा कारभार पूर्णतः प्रशासनाला करता येणार आहे. कोणाच्याही दबावा विना कारभार करता येणार असल्याने प्रशासनाने धमक दाखवून शहरातील पाणी पुरवठा, पथदिवे, खड्डेमुक्त रस्ते ही कामे प्राधान्याने करावी. याशिवाय छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे कामही जलदगतीने मार्गी लावावे. वर्षभरापूर्वी या कामासाठी मनपाने प्रोफेसर कॉलनी चौकातील हातगाडीवाले, फेरीवाले यांना स्थलांतरित केले. परंतु प्रत्यक्षात पुतळा उभारणीचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे इतका काळ सामान्य विक्रेत्यांचा व्यवसाय बंद करून मनपा प्रशासनाने काय साध्य केले हा प्रश्नच आहे. मनपा आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी नगरसेवक कुमार वाकळे यांनी सुरूवातीपासून पाठपुरावा केला.असाचा पाठपुरावा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी कोणत्याही नगरसेवकांनी केला तर त्याला पक्ष म्हणून आणि शिवप्रेमी म्हणून आमचा पाठिंबाच राहिल असेही कळमकर यांनी म्हटले आहे.
नगररचना विभागातील गैरकारभार थांबवावा…
मनपाच्या नगररचना विभागात सर्वसामान्यांची अडवणूक होते. बांधकाम परवानगीसाठी सर्रास पैसे घेतले जातात. नगरसेवकांनाही तेथील अधिकारी, कर्मचारी जुमानत नाहीत असा आरोप नगरसेवकांनीच महासभेत केला. प्रशासक राज मध्ये नगररचना विभागाचीही योग्य साफसफाई करून कामकाजात पारदर्शकता आणावी अन्यथा नवीन वर्षात या प्रश्नी आक्रमक होऊन धडा शिकवला जाईल असा इशाराही अभिषेक कळमकर यांनी दिला आहे.