बीड : बीड वासियांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या रेल्वेची चाचणी आज बीड जवळील विघनवाडी ते राजुरीपर्यंत करण्यात आली. खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत हि चाचणी करण्यात आली असून रेल्वेच्या अधिकाऱ्यांना यापुढील रेल्वे मार्गबाबत खासदार सोनवणे यांनी सूचना केल्या आहेत.
नगर ते बीड परळी रेल्वे मार्ग मध्य रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. २६१. किलोमीटर लांबीचा हा मार्ग करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात नगर ते अमळनेर असा १००. ८ किलोमीटरचा मार्ग यापूर्वीच पूर्ण झाला होता. यानंतर रेल्वे मार्गातील अमळनेर ते विघनवाडी या अंतरापर्यंत काम ९ ऑगस्ट २०२४ ला हे काम पूर्ण झाल्यानंतर बीडच्या शिरूर तालुक्यातील विघनवादी ते बीड अशी ३५ किलोमीटर अंतरापैकी नवगण राजुरी गावापर्यंतचे रेल्वे रूळ टाकण्याचे काम देखील पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण झाल्याने या मार्गावर रेल्वे चाचणी आज घेण्यात आली आहे.
मागील काही वर्षांपासून नगर- बीड-परळी असा रेल्वे मार्ग मंजूर हल्यानंतर मार्ग तयार करण्याचे काम सुरु होते. टप्प्याटप्प्याने या मार्गाचे काम करण्यात येत आहे. आता काही अंतराचे काम बाकी असून ते पूर्ण करण्यासाठी गती मिळाली असून येत्या २६ जानेवारीपर्यंत काम पूर्ण करून बीड पर्यंत रेल्वे मार्ग पूर्ण करण्यात येणार असून बीडपर्यंत रेल्वे पोहचणार असल्याने विकासाच्या दृष्टीने पाऊल आहे.
शिरूर तालुक्यातील विघनवाडी ते बीड जवळील राजुरी पर्यंत ही पहिली चाचणी केली गेली. रेल्वे कृती समितीने यासाठी खूप मोठा लढा घेतला. या लढ्याचे फळ आणि स्वप्न पूर्ण करण्याचं काम माझ्या काळात पूर्ण होत आहे. आज राजुरी पर्यंत ही चाचणी झाली असून २६ जानेवारी पर्यंत रेल्वे बीडपर्यंत रेल्वे येणार असल्याचा शब्द मी पूर्ण केला असल्याचं खासदार सोनवणे यांनी म्हटले आहे.






