नगर- पाथर्डी भाजप मधील आमच्या सारख्या जुन्या निष्ठावंतांना योग्य तो सन्मान देत नसल्याचा आरोप करत आज भाजप चे माजी तालुकाध्यक्ष व विद्यमान जिल्हाउपाध्यक्ष माणिक खेडकर यांनी भाजप ला सोडचिठ्ठी दिली. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खेडकर म्हणाले कि विखे यांनी उमेदवारी दाखल केल्या पासून त्यांच्या एकाही कार्यक्रमाला त्यांनी मला बोलावले नाही. त्यांचे साडेतीन कार्यकर्तेच त्यांचा कारभार पाहतात.
गेल्या पस्तीस वर्षांपासून मी भाजप चे काम करतो मात्र माझ्यासह जे पंकजा मुंडे यांचे काम करतात त्यांना भाजप मध्ये नंतर आलेले राजळे व विखे हे सातत्याने डावलण्याचे काम करतात. ह्या दोघांच्या कार्यपद्धतीला कंटाळूनच शेवगाव च्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप ला सोडचिठ्ठी दिली आहे. मी दोन वेळा भाजप तालुकाध्यक्ष असताना मला विचारून कधीही कोणताही निर्णय राजळे यांनी घेतला नाही उलट माझे गाव असलेल्या भालगाव मध्ये सुद्धा निधी देताना मला विश्वासात घेण्यात आले नाही. तुम्ही पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आहात असे म्हणून आम्हाला सापत्नभावाची वागणूक देण्यात आली. लोणी येथे नरेंद्र मोदी,अमित शहा,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री येऊन गेले मात्र या कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांना निमंत्रित करण्यात आले नाही अन आता निवडणूक आली म्हणून त्यांनाच प्रचारसभेला बोलवत आहेत.
भाजप हा ओबीसी केडर चा पक्ष असल्याचे सांगतो प्रत्यक्षत मात्र माझ्या सारख्या ओबीसी वर अन्याय करण्याचे काम केले जात आहे. विखे व राजळे हे भाजपात नंतर आले असून त्यांना भाजप च्या जुन्या कार्यकर्त्यांचे काहीही देणे घेणे नाही. ते त्यांच्या सोबत आलेल्या त्यांच्या गटातटाचे नेतृत्व करतात. आपल्यावर अन्याय होतो आहे हे अनेकवेळा आपण पक्षश्रेष्ठीना सांगितले मात्र उपयोग न झाल्याने आपण भाजप ला रामराम करत असून लवकरच अनेक कार्यकर्ते सुद्धा भाजपातुन बाहेर पडणार आहेत. पुढे काय निर्णय घ्यायचे हे वेळ आल्यावर ठरवूत असे शेवटी खेडकर म्हणाले.