नगर : चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना सिद्धार्थनगरमध्ये आज, मंगळवारी दुपारी घडली. रेवती ऊर्फ राणी संदीप सोनवणे (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती संदीप ऊर्फ कुंदन राधाजी सोनवणे याच्याविरुद्ध तोफखाना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात रेवती यांचे वडील बाळू केशव साठे (रा. बुऱ्हाणनगर, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
संदीप व रेवती यांच्या विवाहाला १८ वर्षे झाली आहेत. त्यांना दोन मुली आहेत. संदीप हा सतत रेवतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत होता. रेवती वडिलांकडे तक्रार करायची. ते तिला माहेरी घेऊन येत होते. ६ जूनच्या रात्री संदीपने रेवती आणि दोन्ही मुलींना मारहाण करून भर पावसात घराबाहेर हाकलले. त्या तिघींना वडील बाळू साठे यांनी एमआयडीसीतील त्यांच्या नातेवाइकाकडे ठेवले. तेथे त्या तीन दिवस राहिल्या. नंतर साठे यांनी त्यांना घरी, बुऱ्हाणनगर येथे आणलेे. संदीप सासरी बुऱ्हाणनगरला आला आणि तेथेच राहू लागला. त्याने मारहाण केल्याची चूक कबूल केली. साठे यांनीदेखील त्याला समज दिली. काल, सोमवारी सकाळी साडेआठ वाजता संदीपने सासरे साठे यांची दुचाकी घेतली आणि तो पत्नी रेवतीला घेऊन सिद्धार्थनगरला आला. दुसऱ्या दिवशी आज, मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास मुलीला भेटण्यासाठी व दुचाकी आणण्यासाठी साठे मुलीच्या घरी आले असता, त्यांना मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. पोलिसांनी रेवतीला रुग्णालयात नेले. मात्र, तिचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.