लोकसभा निवडणुकीनंतर झाले गेले आपण विसरून गेलो आहोत. जिल्ह्यात विखे हे मोठे घराणे आहे. सहकारात त्यांचे मोठे काम आहे. त्यांच्याकडून किंवा माझ्याकडून निवडणुकीत एखादा शब्द घसरला गेला असेल, तर तोच धरून बसणे योग्य नाही. आपल्याला जिल्ह्याचे राजकारण बदलायचे आहे. मी बाहेर गेलो, की अभिमानाने सांगतो मी महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यातील आहे. जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) असलेले काम आपण पालकमंत्री म्हणून विखे यांना हक्काने सांगू. त्यांचे आशीर्वाद घेऊ, अशी भूमिका खासदार नीलेश लंके यांनी जाहीर केली आहे. केडगाव उपनगरातील ग्रामस्थ व सर्व पक्षांच्या वतीने खासदार नीलेश लंके यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ग्रामदेवी रेणुकामाता मंदिरात लंके यांच्या हस्ते आरती करण्यात आली व मिरवणूक काढण्यात आली.
खासदार लंके म्हणाले, की कोठे थांबायचे हे समजले नाही, तर आपल्याला बदल घडवता येणार नाही. राजकारण कुठपर्यंत करायचे? निवडणूक संपली, झाले गेले विसरून जायचे. एकमेकांकडे मारक्या म्हशीसारखे पाहत बसू नका. नगर शहर हे मध्यवर्ती आहे. शहराचा चेहरामोहरा बदलायचा आहे.
या वेळी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक अमोल येवले, विजय पठारे, योगिराज गाडे, मनोज कोतकर, हर्षवर्धन कोतकर, अजय आजबे, कार्तिक सातपुते, संजय मुनोत यांचे भाषण झाले. विठ्ठल महाराज कोतकर, रावसाहेब भाकरे, विशाल पाचारणे, शिवाजी डमाळे, अंगद महानवर आदी उपस्थित होते.