अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मोबाईलवरून बोलणाऱ्या व्यक्तीला शिवीगाळ केल्यामुळे बाजूला उभ्या असणाऱ्या व्यक्तीला राग आला. यातून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील बोर्ले येथील मयत शिवाजी रामदास चव्हाण हा आपल्या नातेवाईकासमवेत दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी बोर्ले ते जवळा रोडवरील एका हॉटेलमध्ये गेला होता. यावेळी सायंकाळी ७:४५ च्या सुमारास मयत शिवाजी चव्हाण हॉटेलच्या बाहेर कोणाशी तरी फोनवर मोठ्याने बोलत शिवीगाळ करत होता. त्या ठिकाणी दुसरा व्यक्ती म्हणजे आरोपी सुरेश बाबुराव पठाडे हा आला. शिवीगाळ का करतो, या कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची होऊन जोराचे भांडण लागले. या भांडणाची माहिती मयताचे वडील रामदास चव्हाण यांना समजताच ते आपल्या पत्नीसह तातडीने त्या ठिकाणी मोटारसायकलवर पोहचले.
यावेळी सुरेश पठाडे आदित्य (उर्फ) गोपाल सुरेश पठाडे तसेच एक अनोळखी इसम असे तिघे जण शिवाजी यास मारहाण करत होते. यावेळी त्या ठिकाणी असलेले शिवाजीचे नातेवाईक लक्ष्मण सुखदेव मते रा. मतेवाडी, फिर्यादीचा पुतण्या निलेश अभिमान चव्हाण तसेच मयताचे आई वडील हे देखील भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आरोपी हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी आरोपी सुरेश पठाडेसह इतर आरोपींनी शिवाजीला गजाने आणि लाकडाने मारहाण केली. शिवीगाळ करून घटनास्थळाहून निघून गेले. या मारहाणीत शिवाजी रामदास चव्हाण (३२) रा. बोर्ले. ता. जामखेड हा गंभीर जखमी झाला. शिवाजीच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव होत होता.
यानंतर घटनेची माहिती समजताच फिर्यादी यांच्या भावाची मुले दिलीप चव्हाण आणि अंकुश चव्हाण हे घटनास्थळी आले. त्यांनी तातडीने खाजगी वाहनाने जखमी शिवाजी यास जामखेड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र शिवाजी चव्हाण याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
फोनवर शिवीगाळ एकाला; मात्र राग दुसऱ्याला, अहमदनगरमध्ये एकाची हत्या!
- Advertisement -