*.*
नगर शहरातील खड्डेमय रस्त्यांचे ग्रहण सुटणार कधी
लोकप्रतिनिधी कोट्यवधींचा निधी आणल्याचा दावा करतात मग रस्ते खड्डेमय कसे ?
माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा सवाल
नगर : नगर शहर व रस्त्यांवरील खड्डे यांचे अतूट नाते मागील नऊ दहा वर्षात तयार झाले आहे. शहराचे लोकप्रतिनिधी रस्त्यांच्या विकासासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी खेचून आणल्याचा दावा करतात. तो खरा असेल तर मग एवढे कोट्यवधी रुपये मुरले कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण शहरात एकही रस्ता वाहतूक योग्य राहिलेला नसून ‘खड्डेच खड्डे चहुकडे गेले रस्ते कोणीकडे असे….’ नागरिक म्हणत आहेत. शहराचा मध्यवर्ती भाग, बाजारपेठ, उपनगरांत सर्वत्र रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य कायम आहे. शहराच्या आमदारांनी नुकतीच मनपा अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहरातील कचरा व्यवस्थापनाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना खड्डे व त्यामुळे सामान्य नगरकरांना दररोज सहन करावा लागत असलेला त्रास दिसला नाही का ? स्वच्छतेचा विषय हा त्या त्या भागातील नगरसेवकाचा असतो. ते काम आमदाराचे नाही. स्वच्छते एवजी त्यांनी खड्यांची पाहणी केली असती तर त्यांना शहराची झालेली बिकट अवस्था दिसली असती. मात्र त्यांना नागरिकांच्या प्रश्नांशी काहीही देणे घेणे नाहीये. शहर विकासासाठी २० कोटी आणले, ३० कोटी आणल्याचा दावा आमदार कायम करत असतात. मात्र त्यातून काय कामे झाली हे संशोधनाचा विषय आहे. मीही शहराचा महापौर होतो. त्यामुळे मला माहितीये जर शहरातील रस्ते खड्डेमुक्त करायचे असेलतर ३ कोटी रुपयेही खूप झाली. आज ते सत्ताधारी आमदार आहेत. शहराच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३ ते ४ कोटी रुपये आणणे त्यांना सहज शक्य आहे. पण आमदारांना त्यात रस नाहीये. त्यामुळे शहरातील खड्डेमय रस्त्यांचे ग्रहण सुटणार कधी, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी उपस्थित केला आहे. महानगरपालिकेच्या वतीने शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी ५० लाख रुपयांचे टेंडर काढले होते. त्याचे बिलही ठेकेदारांना मंजूर झाले आहे. पण एकही रस्त्याचे पॅचवर्क झालेले दिसत नाहीये. नागरिकांचा असलेला हा पैसा गेला कोठे. हे सर्व कामे बोगस झालेली आहेत. असा आरोप कळमकर यांनी केला.
शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने बुधवारी सकाळी शहरातील विविध भागांमध्ये खड्डेमय रस्त्यांची पाहणी करून मनपाने केलेले पॅच वर्क केवळ कागदोपत्रीच झाले असल्याचा आरोप अभिषेक कळमकर यांनी केला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नामदेव पवार, राजेश मालपाणी, उमेश भांबरकर, भिमराज कराळे, अभिषेक जगताप आदी उपस्थित होते. यावेळी चौपाटी कारंजा ते कोर्टगल्ली रस्ता, लालटाकी ते सर्जेपुरा रस्त्यावर पडलेल्या खड्यांची पाहणी करण्यात आली. खड्डे बुजवण्यासाठी काहीतरी करा हो अशी विंनती यावेळ जा ये करणारे नागरिक कळमकर यांना करत होते.
नगर शहरातील खड्डयांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. खड्डेमय रस्त्यावरुन वाहन चालवताना नागरिक त्रासले आहेत. अनेकांना मणक्यांचे, सांध्याचे विकार जडून त्यांना दवाखान्यावर हजारो रुपये खर्च करावे लागत आहे. महिलांना, शाळकरी मुलांनाही याच खड्डेमय रस्त्यांवरुन सायकल चालवत वाट काढावी लागते. शहरातील आमदारांच्या मर्जीतील ठराविक भागातीलच रस्ते चकचकीत होत आहेत. मॉडेल रस्ता म्हणून गवगवा झालेल्या तोफखाना पोलिस स्टेशन ते भिस्तबाग रस्त्याची तर सहा महिन्यातच वाट लागली आहे. पाईपलाईन रोड, गुलमोहोर रोड, मिस्किनमळा रस्ता वर्ष पूर्ण होण्याच्या आतच उखडले गेले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातही बाजारपेठेत रस्त्यांची मोठी दुरवस्था आहे. कुठे काम सुरु असेल तर ते सहा महिने, वर्षभर रेंगाळलेले असते. त्याचा अधिकचा त्रास नगरकरांना सहन करावा लागतो. अशावेळी कुठे गेले तुमचे विकासपर्व असे सर्वसामान्य नागरिक विचारत आहे.
महानगरपालिका प्रशासनावर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची जरब असायला हवी. आयुक्तांवरही त्यांचा विकासाच्या दर्जाच्या कामांसाठी दबाव व धाक असायला हवा. अशावेळी आयुक्तांमार्फत त्यांनी रस्त्यांच्या दर्जाबाबत लक्ष दिले पाहिजे. मनपाने रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांकडून गुणवत्ता राखली जाईल याची काळजी घेतलीच पाहिजे. दुर्देवाने प्रशासन आपल्या कर्तव्यात कमी पडत असल्याचे चित्र आहे. नगरची नवी ओळख निर्माण होत असल्याचे नेहमीच सांगितले जाते. पण त्याआधी खड्डयांचे शहर ही ओळख संपुष्टात आली पाहिजे. त्यासाठी इच्छाशक्ती दाखवली तर नगरची जनता तुम्हाला खरोखरच मनापासून धन्यवाद देईल, असेही कळमकर यांनी म्हटले आहे.
————————————-
फोटो –
नगर शहरातील खड्डेमय रस्त्यांची पाहणी करताना माजी महापौर अभिषेक कळमकर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी.