नगर : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र असे असले तरीही जिल्हा परिषद प्रशासनाकडून पूर्वतयारी म्हणून बदलीपात्र व विनंती बदलीसाठी पात्र कर्मचाऱ्यांची माहिती संकलित केली जाणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर जूनमध्ये ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी ३१ मेअखेर बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाते. आता मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जूनमध्ये या बदल्या होण्याची शक्यता आहे. यापूर्वी करोना कालावधीत कर्मचाऱ्यांच्या ऑगस्टमध्ये बदल्या झाल्या होत्या. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबवण्यासाठी ग्रामविकास विभाग दरवर्षी वेळापत्रक जाहीर करत असते. या आदेशात प्रशासकीय व विनंती बदल्यांचे प्रमाण राज्य पातळीवर निश्चित करून देऊन ते सर्व जिल्हा परिषदेत एकसारखे प्रमाणात राबवले जाते. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. असे असले तरी बदल्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर माहिती संकलित करून ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जाणार आहे.