अजित पवार यांच्या सरकारमधील समावेशामुळे भाजपला काहीही फरक पडणार नसल्याचा दावा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार महायुतीत सहभागी झालेत. पण महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. आमच्या पक्षाच्या सदस्यांची संख्या 18 कोटींवर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या सहभागामुळे भाजपला काही फरक पडेल असे वाटत नाही. या प्रकरणी जो काही नफा तोटा होईल तो भविष्यात समजेल, असे अजय कुमार मिश्रा यांनी म्हटले आहे. ते सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
मिश्रा यांनी यावेळी महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व 48 जागांवर भाजप व मित्रपक्षांचा विजय होणार असल्याचा दावाही केला. भाजप व मित्र पक्षांचा महाराष्ट्रातील सर्वच 48 जागांवर विजय होईल, असे ते म्हणाले. सातारा लोकसभेच्या निवडणुकीत नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा संबंधीचा एक प्रश्न यावेळी त्यांना करण्यात आला असता त्यांनी त्यावर भाष्य करणे टाळले. वरिष्ठ कार्यकारिणीची अद्याप बैठक झाली नाही. या बैठकीत उमेदवारांची नावे निश्चित केली जातील, असे मिश्रा म्हणाले. विशेष म्हणजे मिश्रा यांना हा प्रश्न करण्यात आला, त्यावेळी विद्यमान खासदार उदयनराजे त्यांच्या शेजारीच बसले होते. पत्रकाराच्या या प्रश्नामुळे ते चांगलेच अचंबित झाले होते.
मराठा व धनगर आरक्षणाच्या मुद्यावर योग्यवेळी निर्णय घेतला जाईल. या प्रकरणी सध्या घटनात्मक तरतुदी तपासून चिकित्सा समिती त्यावर विचार करत आहे, असेही अजय कुमार मिश्रा यांनी यावेळी स्पष्ट केले.