”आधी लोकसभेची निवडणूक आहे. त्यानंतर तुमच्या मनात आहे ते होईल’, असं म्हणत पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकेत दिले आहेत. आज रायगडच्या कर्जतमध्ये अजित पवार गटाची निर्धार सभा पार पडली. यात बोलताना ते असं म्हणाले आहेत.
अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी यांनी मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची लढाई लढली. आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आणि कोर्टात केस सुरू असल्याने काही निवडणुका थांबल्या आहेत. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी मागच्या ९ वर्षात जाहीर केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. शासन आपल्या दारी त्या माध्यमातून लोकांच्या दारात जाऊन त्यांना लाभ देण्याचा काम महायुतीचे सरकार करत आहे.
अजित पवार पुढे म्हणाले, ”काही जण विचार करतील ही भूमिका का घेतली? देशपातळीवर काही जण दुसरीकडे जातात, पण आपली विचारधारा सोडत नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. सगळ्या समाजाने आपआपल्या भागात गुण्यागोविंदाने राहावं.”