शहरात राजकीय वर्चस्व वादातून एकाच ठिकाणी दोन-दोन गणेश मंडळांनी मंडप उभारणीसाठी दावे केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून तीन ते चार मंडळाचे वाद मिटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. यात आडते बाजार व्यापारी युवक मंडळ व भारत सहकार मित्र मंडळ यांच्यात वाद विकोपाला गेले. एकमत होत नसल्याने अखेर पोलिसांनी आडते बाजार चौक ही जागाच सील केली. यापुढे सर्वच कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.
स्वस्तिक चौक येथे राजयोग प्रतिष्ठान व जनजागृती मित्र मंडळ, आडते बाजार येथे व्यापारी युवक मंडळ व भारत सहकार मित्र मंडळ, झोपडी कॅन्टीन येथे अभिषेक कळमकर व गजेंद्र भांडवलकर, तसेच वैदुवाडी परिसरात मंडप उभारणीच्या परवानगीवरून वाद निर्माण झाले होते. त्यात आडते बाजार चौकातील वाद वगळता इतर ठिकाणी तोडगा निघाला आहे.
आडते बाजार चौकात दोन्ही मंडळांमध्ये तोडगा निघत नसल्याने अखेर पोलिसांनी दोघांनाही परवानगी नाकारली आहे. या चौकात पुढील काळात गणेशोत्सवासह शिवजयंती, दहीहंडी, नवरात्र उत्सव, हनुमान चालीसा, स्वातंत्र्य दिन व इतर कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम व महापुरुषांची जयंती साजरी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या दोन्ही मंडळाच्या प्रतिनिधींकडून तसे हमीपत्रही लिहून घेण्यात आले आहे. दरम्यान, या निर्णयानंतर एका गटाने हमीपत्रांचे फलक करून चौकात लावले होते. त्याची मोठी चर्चा नगर शहरात रंगली होती