अमरावती : ‘‘ही निवडणूक आपल्याला ग्रामपंचायतीप्रमाणे लढवावी लागेल, आपले जेवढे मतदार आहेत ते सर्व बुथपर्यंत गेले पाहिजेत. मोदींची हवा आहे या भ्रमात राहू नका. मी २०१९ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले होते. एवढी मोठी यंत्रणा असूनही एक अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो, हे तुम्ही लक्षात ठेवा’’, असे वक्तव्य भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी एका प्रचार सभेत केले.
राणा यांच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, विरोधकांना आयते कोलीतच मिळाले आहे. राणा यांनी त्यांच्या प्रचार सभेतच मोदींची हवा नसल्याचे स्पष्ट केल्याने खळबळ उडाली आहे. राणांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, ‘‘देशातील संविधानिक संस्थांचा कितीही गैरवापर केला तरी भाजपचा पराभव अटळ आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना त्याची जाणीव झाली, तशीच नवनीत राणा यांनाही झाली आहे.’’
नवनीत राणा यांनी मंगळवारी एक चित्रफीत प्रसारीत करून, आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यामुळे देश प्रगतीपथावर आहे. आम्ही त्यांच्या नावावरच लोकांकडे मत मागत आहोत. मोदी यांच्या कार्यकाळातील विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजपची उमेदवार म्हणून मी करीत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी देखील विरोधकांनी आपले एक वक्तव्य संपादित करून त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला. ते वक्तव्य आपण आमदार बच्चू कडू यांना उद्देशून केले होते, असे स्पष्टीकरण राणा यांनी दिले आहे.