बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाल्याच्या विवंचनेतून अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा गावच्या पांडुरंग सोनवणे व आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी गावच्या पोपटराव वायबसे यांनी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोनवणे व वायबसे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे दुःख वाटून घ्यायचा प्रयत्न केला. खरंतर दोन्ही कुटुंबासाठी हे दुःख पचवण्या पलीकडचे आहे.
दोघांनाही दोन-दोन अपत्ये आहेत. त्यांच्या नावे भविष्यासाठी काही रक्कम फिक्स डिपॉझिट करत आहे. शिवाय दोघांच्याही पत्नीला शक्य त्या प्रकारची खाजगी नौकरी मिळवून देण्यात येईल. मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची देखील जबाबदारी मी घेतली आहे.
पण एका निवडणुकीत पराभव झाला म्हणून इतकं टोकाचं पाऊल उचलावं, ही भावना आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारी आणि मनात अपराधीपणाची भावना निर्माण करणारी आहे. निवडणुका, संधी येत राहतील, जय-पराजय होत राहतील, पण मानवी जीवन आणि कुटुंब एकदाच मिळते; काही केल्या ते परत मिळत नाही. कोणताही टोकाचा निर्णय घेण्याआधी याचा विचार केला पाहिजे. निवडणूक सोडून द्या, पण आत्महत्या हा कोणत्याच अडचण, संकट किंवा नैराश्याचा उपाय ठरू शकत नाही, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.