इतिहासाच्या पाऊलखुणा : देवनागरी लिपीतील औरंगजेबाचे नाव असलेला पहिलाच शिलालेख
नगर तालुक्यातील कामरगावामध्ये मुगल बादशाह औरंगजेबाचे नाव असलेला देवनागरी लिपीतील शिलालेख आढळला आहे. हा शिलालेख गावातील एका विहिरीच्या तळाशी बसविण्यात आला आहे. औरंगजेबाचे नाव असलेले फारसी लिपीतील शिलालेख आढळतात मात्र देवनागरी लिपीतील बहुधा हा पहिलाच शिलालेख असावा असे मत इतिहास संशोधकांनी व्यक्त केले .
विशेष म्हणजे या शिलालेखाचे वाचन कामरगाव मधीलच इतिहास अभ्यासक सतीश भिमराव सोनवणे यांनी केले आहे.
हा शिलालेख छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीतील आहे . या शिलालेखात म्हटले आहे की , शक संवताच्या १६१४ व्या वर्षात अंगिरा संवत्सरात वैशाख शुद्ध तृतीयेला शनिवारी औरंगजेब आलमगीरच्या कामरगावातील रहिवासी अब्दुल सलाम ऊर्फ साउजी बापुजी यांनी २५१ रुपये खर्च करुन विहीर सयाजी पाटील प्रतापजीने बांधली.
पिले जंत्री नुसार शिलालेखाची इंग्रजी तारीख दि .९ एप्रिल १६९२ अशी येते. म्हणजे ही विहीर तब्बल ३३२ वर्षे जुनी आहे.
पाच ओळींच्या या शिलालेखाची लिपी देवनागरी असली तरी काही अक्षरे मोडी वळणाची आहेत. शिलालेख खोदीव स्वरूपाचा आहे.यात बाशिंदा हा फारसी शब्द आलेला आहे ज्याचा अर्थ रहिवासी असा होतो . औरंगजेबाचे मूळ नाव मुहिउद्दीन मोहम्मद होते त्याचा संक्षेप मु. मो.असा कोरलेला दिसतो.
इसवी सन १६८१ मध्ये औरंगजेब दख्खनच्या स्वारीवर आला. त्याच्या आयुष्याची शेवटची २६ वर्षे त्याने इथच घालवली .परंतु त्याचा इथे निभाव लागला नाही आणि इसवी सन १७०७ मध्ये नगर जवळ त्याचा मृत्यू झाला. औरंगजेब दक्षिणेत आला त्यावेळी त्याची जवळ जवळ पाच लाखांची सैन्य छावणी नगर जवळ होती. दक्षिणेत आल्या नंतर बऱ्याच किल्ल्यांची गावांची नावे बदलण्याचा त्याने प्रयत्न केला. शिलालेखात उल्लेख असलेले आंधळे घराण्यातील साउजी बापुजी हे त्यावेळी कामरगावचे पाटील होते. त्यांनी इसवी सन १६९२ मध्ये गावात एक पाय विहीर (बारव)बांधली . विहीरीचे बांधकाम अक्षय तृतीयेला पूर्ण झाले . गढीचे बांधकाम करताना पाणी पुरवठ्याची सोय म्हणून ही विहीर बांधली असावी. या विहिरीत उतरण्यासाठी पूर्वी पायऱ्या होत्या नंतरच्या काळात त्या बुजविण्यात आल्या .विहिरीवरील किंवा बारवे वरील शिलालेख हे सामान्यपणे कमानीवर किंवा विहिरीच्या वरच्या भागात असतात. हा शिलालेख मात्र तळाशी आहे हे आणखी एक वेगळेपण. याच साऊजी बापुजींनी गावात इसवी सन १६९९ मध्ये एक गढी बांधली होती. गढी वरील शिलालेखात मात्र औरंगजेबाचे नाव टाकलेले नाही. कदाचित त्यांना नाव टाकण्यासाठी सक्ती करण्यात आली असावी त्यामुळे त्याची जागा दाखवून देण्यासाठी जाणीव पूर्वक त्यांनी शिलालेख विहिरीच्या तळाशी बसवला असावा. औरंगजेबाच्या कारवाया पासून गावचे रक्षण करण्यासाठी साऊजी बापुजी यांनी अब्दुल सलाम हे नाव धारण केले असावे कारण गढी वरील शिलालेखात फक्त साउजि बापुजी आंधळे हेच नाव टाकलेले आहे. यात उल्लेख आलेले सयाजी आणि प्रतापजी यांच्या बद्दल माहिती उपलब्ध नाही.
काय आहे शिलालेखाचा मजकूर
▪️ सके १६१४ अंगिरा संवतसरे वैसाख सुद्द ३
▪️सनवार अबदुळ सलाम उर्फ सावजी
▪️बापुजी बसींदा राजसा औरंगजेब आलमगी
▪️ मु मो, कामरगाव कर्च वीहीर २५१ रुपये
▪️ सयाजी पाटिळ परतापजीने बां[धिली].
शिलालेख हे इतिहासाचे अस्सल साधन म्हणून ओळखले जातात . काही अभ्यासकांच्या मते कामरगाव हे अंताजी माणकेश्वर यांनी वसवले परंतु ते मत चुकीचे ठरते कारण कामरगावचा उल्लेख असलेले हे शिलालेख त्यांच्या जन्माच्या अगोदरचे आहेत.
साधारणपणे २० फूट खोल विहिरीत असलेल्या या शिलालेखाचा छाप घेणे एक अवघड गोष्ट होती. विहिरीला पाणी असल्याने शिलालेख फक्त उन्हाळ्याच्या दिवसांत दिसतो. मी मागच्या वर्षी पाणी कमी झाल्यानंतर कॅमेऱ्याचा वापर करुन फोटो मिळवला.शिलालेख वाचन करण्याकामी कृष्णा गुडदे यांचे सहकार्य लाभले. ” —- सतीश सोनवणे ( इतिहास संशोधक )