ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी
अर्ज करण्याचे आवाहन
अहमदनगर, दि. 15 जुलै :- इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या व शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे म्हणुन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु करण्यात आली आहे. जिल्हा तसेच तालुकास्तरावर 12 वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक राधाकिसन देवढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
योजनेच्या लाभासाठी इयत्ता १२ वीमध्ये ६० टक्के गुण आवश्यक, महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा (कॅपलेटर) व बोनाफाईड, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जातीचा व उत्पन्नाचा दाखला, भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवाशी नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र (नोटरी), दिलेली माहिती खरी असल्याबाबत स्वयंघोषणापत्र, कोणत्याही शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र, भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिठ्ठी, भाडे करारपत्र-करारनामा, घरमालकाचे आधारकार्ड व विद्युत देयक, विद्यार्थ्याचे आधारकार्ड, विद्यार्थी महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहत असल्यास वसतीगृहाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
या योजनेंतर्गत विद्यार्थ्याला भोजन भत्ता 28 हजार रुपये, निवास भत्ता 15 हजार रुपये, निर्वाह भत्ता 8 हजार रुपये असे एकुण 51 हजार रुपये देण्यात येतात. एका शैक्षणिक वर्षातील १० महिन्यांच्या कालावधीसाठी लाभ अनुज्ञेय राहील. लाभाची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न राष्ट्रीयकृत बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाते.
योजनेच्या अधिक माहितीसाठी तसेच विहित नमुन्यातील अर्जासाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सावेडी नाका, अहमदनगर दूरध्वनी क्रमांक 0241-2329378 तसेच मुलांसाठी राहुल पायाळ-7385570550 व मुलींसाठी अंजली खंडाळे 9767892143 यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
विशेष मागास प्रवर्गातील सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
- Advertisement -