जिल्ह्यातील 37 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियुक्ती
नगर : नगर जिल्ह्यातील 37 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची अनोखी भेट मिळाली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून 10 टक्के कर्मचारी भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून 37 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समावून घेण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती प्रक्रिया झाली असून कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांतून 1 मुख्य सेविका, 2 पशुधन पर्यवेक्षक, 6 ग्रामसेवक, 7 कनिष्ठ सहाय्यक, 2 कनिष्ठ सहाय्यक (लेखा) आणि 19 जणांना आरोग्य सहायक पदी नियुक्ती देण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, सहायक प्रशासन अधिकारी आंधळे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी ग्रामपंचायत विभाग सुभाष दळवी , कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रमोद राऊत, वरिष्ठ सहाय्यक कासार मॅडम, संदीप तुळेकर यांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून 10 टक्के कर्मचारी भरती केल्याबद्दल ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी या नियुक्ती प्रक्रियेकडे डोळे लावून बसले होते. जि.प.प्रशासनाने शासन नियमानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करीत नियुक्त्या दिल्याने कर्मचारी व त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. नवीन वर्षाची ही सर्वात संस्मरणीय भेट मिळाल्याची भावना कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.