भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. विरोधकांनी या घटनेला शिंदे गट आणि भाजपामधील गँगवॉर असल्याचे म्हटले. आगामी निवडणुकीच्या तोंडावर ही घटना महायुतीमध्ये मीठाचा खडा टाकणारी ठरू शकते, अशी चर्चा होऊ लागल्यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावर भाष्य केले आहे. शिंदे-फडणवीस यांच्यात कोणतीही वर्चस्वाची लढाई नाही. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार स्पर्धा न करता एकत्र काम करत आहेत, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
“एखाद्या घटनेमुळे महायुतीत फरक पडत नाही. अनवधानाने काही घटना घडतात. या घटनेची सखोल चौकशी गृहखातं करत आहे. यापूर्वी महाराष्ट्रात अशा घटना १००० वेळा घडल्या आहेत. पण त्या घटनांचे उदाहरण देऊन आजची घटना झाकता येणार नाही. गोळीबार करणे महाराष्ट्राचे संस्कार नाहीत. आम्हाला ही घटना मान्य नाही. झालेला प्रकार दुर्दैवी असून पुढील काळात राज्याला गालबोट लागणार नाही, अशी काळजी सर्वांनीच घेतली पाहीजे. गृहखात्याचा अहवाल आल्यानंतर पोलीस कारवाई करतीलच पण पक्षही कारवाई करणार आहे”, असेही बावनकुळे म्हणाले.