बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात काल रात्री मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दहा जणांचा जागीच मृत्यू झाला. यात पहिला अपघात रुग्णवाहिका आणि ट्रकचा झाला, तर दुसरा अपघात हा सागर ट्रॅव्हल्स नावाच्या खाजगी बसचा झाला आहे. बीड धामणगावहून अहमदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दौलावडगावजवळ असलेल्या बँकॉक कंपनीकडे वळत असताना ट्रक आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. यात डॉक्टरसह चौघा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
तर जामखेड अहमदनगर मार्गावर आष्टा फाट्याजवळ सागर ट्रॅव्हल्स या खाजगी बसच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही बस पलटी झाली. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.
आष्टी तालुक्यातील रात्रीच्या सुमारास मृत्यूचे तांडव झाल्याने आणि यात दहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. अपघाताची घटना घडल्यानंतर आष्टीचे आमदार सुरेश धस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.