पंधरा दिवसापासून आपण पालकमंत्र्यांना जरा सबुरीने घेण्याचा सल्ला देतोय, पण ते काही ऐकत नाहीत. रोज बहिणीच्या अडचणी वाढवणारी वक्तव्य करत आहेत. एकूणच त्यांची सगळी धावपळ बहिणीचा पराभव करण्यासाठीच आहे की काय, असं म्हणत बीड मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडेना टोला लगावला आहे. सरपंचांना दारात येऊ नका म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांना जनतेची मते मागण्याचा अधिकार नाही.
सोमवारी आष्टी तालुक्यातील एका सभेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, “सरपंचांना विचारले तर लोक ऐकत नाहीत, असं सांगतात, उद्या कामे घेऊन आलात तर सरकार आमचे ऐकत नाही, असं आम्ही म्हणालो तर” मुंडेच्या या वक्तव्याचा सोनवणे यांनी चांगलाच समाचार घेतला.
सरपंचाच्या बाबतीत वक्तव्य करून बहिणीच्या (पंकजा मुंडेंच्या) अडचणी वाढवण्याचेच काम पालकमंत्री करत असल्याचा टोला सोनवणे यांनी या वेळी लगावला.
शिवाय आपल्या बहिणीला पाडण्याची त्यांना घाई झाली आहे कि काय, असे वाटू लागले आहे. त्यांचा पराभव जनता करणारच आहे. त्यासाठी चार जूनची वाट तरी बघा असेही बजरंग सोनवणे म्हणाले.