आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने झडप घातली. मुंबईहून पु्ण्याकडे निघालेल्या खासगी बसचा पनवेलजवळ सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. बससमोर अचानक ट्रॅक्टर आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बस ट्रॅक्टरला धडकून २० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
तर ४२ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
यापैकी ७ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातंय. अपघातातील मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही. मात्र, बसमधील प्रवासी डोंबिवली येथील रहिवासी असल्याचं सांगितलं जातंय. नवी मुंबई पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त खासगी बसला बाहेर काढले.