बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांचं आधी अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेवरुन विरोधकांकडून महायुती सरकारवर निशाणा साधला जातोय. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी यासाठी मस्साजोगच्या गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं. सलग 11 तासांच्या रास्ता रोको आंदोलनानंतर पोलीस अधीक्षकांनी गावकऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या होत्या. तसेच पोलीस अधीक्षकांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली. या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. तसेच तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पण चार आरोपी अद्यापही फरार आहेत.
या घटनेवरुन हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला घेरलं जाण्याची शक्यता आहे. विरोधकांनी आज सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावरही बहिष्कार टाकला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार पडलेलल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी परभणी आणि बीडच्या घटनेवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.
“बीड जिल्ह्यात अतिश निर्घृणपणे सरपंचाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी काही लोकांवर कारवाई केली आहे. काहींना सस्पेंड केलं आहे तर काहींना घरी पाठवलं आहे. तीन आरोपी सापडले आहेत, चार आरोपींचा शोध सुरु आहे. ते लवकरच सापडतील. केस सीआयडीला तपासासाठी दिली आहे. स्पेशल एसआयची स्थापन करुन या केस संदर्भात सर्व चौकशी आम्ही करणार आहोत. आरोपी कोणीही असो, कुठल्याच आरोपीला सोडलं जाणार नाही. अशाप्रकारच्या घटना या महाराष्ट्रात गांभीर्यानेच घेतल्या जातात आणि गांभीर्याने घेतल्या जातील. त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातून सर्व धागेदोरे शोधून काढण्याचं काम हे निश्चितपणे करु”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.