एकीकडे राज्यातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असून दुसरीकडे जनता दुष्काळात होरपळून निघत आहे. मात्र, तरीही शिंदे सरकारला यापरिस्थितीचं गांभीर्य नाही. त्यामुळे राज्यातील गंभीर परिस्थिती बघता शिंदे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काँग्रेसनं राज्यपालांकडे केली आहे.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी यासंदर्भातील निवेदन राज्यपालांना सादर केले. या भेटीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.
लोकसभा निडणुकीच्या काळात राज्यांत २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अद्यापही आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘डीबीटी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी खते, बियाणे, औषधे अद्यापही देण्यात आली नाहीत. मात्र, शिंदे सरकार याकडे लक्ष्य द्यायला तयार नाही. त्यांना या परिस्थितीचं गांभीर्य नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली.