गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तामिळनाडूमधील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचा मृतदेह आज तिरुनेलवेली येथे अर्धा जळालेल्या अवस्थेत सापडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीमध्ये त्यांच्या मृतदेह आढळला असून पोलिसांनी तपासासाठी तीन विशेष पथके तयार केली आहेत. मृतदेहाशेजारी पोलिसांना एक चिठ्ठी देखील सापडली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केपीके जयकुमार बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या मुलाने पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
मृतदेहाजवळ केपीके जयकुमार यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून प्रथमदर्शनी ते त्यांनी लिहिलेले असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी तीन विशेष पथके तयार करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांचा मृत्यूच्या घटनेला राजकीय स्वरूप प्राप्त झालं आहे. एआयएडीएमके प्रमुख इपीएस यांनी, ही घटना म्हणजे ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा कळस असल्याचं म्हटलं आहे. तसंच या प्रकरणता जबाबदार असलेल्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसकडून मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.