लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. 29 जुलै रोजी संसदेत केलेल्या चक्रव्यूह भाषणानंतर अंमलबजावणी संचालनालय त्यांच्या घरावर छापा टाकण्याची योजना आखत आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. मी आतुरतेनं ईडीच्या ) अधिकाऱ्यांची वाट पाहत आहे, असंही राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. ईडीच्या सूत्रांनीच यासंदर्भात माहिती दिल्याचंही राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एक पोस्ट करत राहुल गांधी यांनी ईडीच्या छापेमारीबद्दल दावा केला आहे. राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “वरवर पाहता, माझं चक्रव्यूह भाषण दोघांपैकी एकाला आवडलेलं नाही. ईडीच्या आतल्या लोकांनी मला सांगितलं की, तुमच्या घरावर छापेमारीची तयारी केली जात आहे. मी आतुरतेनं ईडीची वाट पाहत आहे. मी स्वतःच्या हातानं त्यांना चहा आणि बिस्किटं खाऊ घालणार आहे.” राहुल गांधी यांनी हे ट्वीट करत ईडीच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग देखील केलं आहे. https://x.com/RahulGandhi/status/1819106372396765206