काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या राधिका खेरा यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर गंभीर आरोप केले. रविवारी (दि. ५ मे) त्यांनी काँग्रेसच्या सदस्यदाचा राजीनामा दिला असल्याचेही जाहीर केले. पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, मी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिरात दर्शनासाठी जाऊन आल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी माझा छळ सुरू केला. मंदिर भेटीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्याबद्दलही काँग्रेस नेत्यांनी मला फटकारले, असेही त्या म्हणाल्या.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत मी सहभागी झाले होते. त्यावेळी यात्रा छत्तीसगड राज्यात पोहोचल्यानंतर काँग्रेस नेते सुशील आनंद शुक्ला यांनी मला दारू पिण्याची ऑफर दिली होती. तसेच रात्री नशेत चार-पाच कार्यकर्त्यांना घेऊन ते माझे दार वाजवत होते, असा खळबळजन आरोपही खेरा यांनी केला आहे. माझ्या छळाबाबत मी सचिन पायलट आणि जयराम रमेश यांनाही माहिती दिली होती, तरीही काहीही कारवाई करण्यात आली नाही. पक्षाच्या हिंदू विरोधी विचारात मी बसत नसल्यामुळे माझा छळ करण्यात आला, असाही आरोप त्यांनी केला.
राधिका खेरा यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरही टीका केली. त्या म्हणाल्या, भारत जोडो यात्रेत राहुल गांधी कुणालाही भेटत नसत. ते फक्त गर्दी असताना पाच मिनिटांसाठी बाहेर यायचे आणि नंतर आपल्या गाडीत जाऊन बसायचे. मी तीन वर्षांपासून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहे. पण अद्याप मला भेटण्याची वेळ देण्यात आली नाही.