पुणे अपघात प्रकरणावर जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही अजित पवारांनी जास्त भाष्य केलं नाही. तसेच, याप्रकरणात त्यांच्याकडून कारवाईसंदर्भात माहितीही दिली जात नाही. त्यामुळे, अजित पवारांच्या भूमिकेवरुन प्रश्न उपस्थित केला जात आहे. अंजली दमानिया यांनी याबाबत केलेल्या प्रश्नावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अपघाताची घटना घडल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचे आरोप होत आहेत. मात्र, केवळ आमदारानेच नाही तर अजित पवारांनीच पुणे पोलिस आयुक्तांना फोन केला का, असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला होता. मी कधीच कोणाला सोडवण्यासाठी फोन करत नाही. मला एखाद्या प्रकरणात फोन करायचा असेल तर मी पोलीस अधिक्षकांना करेन, ग्रामीणचा विषय असल्याचे ग्रामीणच्या पोलीस अधिक्षकांना करेन, असे म्हणत पुण्यातील घटनेत अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय.पत्रकार मित्रांनो, तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं, मीही सांगितलं. याप्रकरणी कुठलाही दबाव नाही, कुणीही पळवाट काढता कामा नये, जो कुणी दोषी असेन त्याला शासन झालं पाहिजे. मी दोषी असेन तर मलाही शिक्षा द्या, असे म्हणत पुणे प्रकरणात फोन केल्याचा आरोप अजित पवारांनी फेटाळून लावला.