मी भारतीय जनता पक्षासोबत आहे. त्यांच्या सरकारमध्ये मंत्री आहे. त्यामुळे त्या सरकारच्या निर्णयाचे समर्थन करतो. मात्र त्या पक्षासोबत असलो तरीही मी भाजपचे विचार स्वीकारलेले नाहीत, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज धुळ्यात स्पष्ट केले.
आमच्या पक्षासाठी महाराष्ट्रातील दोन लोकसभा मतदारसंघ भाजपने सोडले पाहिजेत. त्यासाठी आम्ही आग्रही आहोत. आगामी निवडणुकीत ‘आरपीआय’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी राहील, असे आठवले म्हणाले.
ते म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी हे संविधान बदलतील, असा खोटा प्रचार देशासह राज्यात सुरू आहे. परंतु संविधान बदलण्याची हिंमत कुणामध्येही नाही. संविधान बदलण्याची आवश्यकताही नाही. संविधानामध्ये कायदे करणे, कायद्यात दुरुस्ती, कायदा रद्द करण्याची तरतूद आहे. त्यामुळे संविधान बदलणार या केवळ वावड्या आहेत.’