दुष्काळ आणि दुबारपेरणीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांचा अग्रीम पीक विमा मंजूर झाला आहे. त्यामुळे पीकविम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
एकट्या बीड जिल्ह्यात ७ लाख ७० हजार अर्जदारांसाठी २४१ कोटी रुपयांची नुकसान भरपाई रक्कम मंजूर करण्यात आली आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बळीराजाला दिलासा मिळणार आहे
राज्यात उशीराने दाखल झालेला मान्सून आणि त्यात सप्टेंबर महिन्यात पावसाने मारलेली दडी, यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं होतं. पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेली पिके डोळ्यादेखत करपून जात असल्याने बळीराजाला अश्रू अनावर झाले होते.
सरकारने तातडीने नुकसान भरपाई जाहीर करावी, तसेच पीकविमा देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्यातील १५ जिल्हाधिकाऱ्यांनी भरपाईसंदर्भात अधिसूचना काढली.
पण, पीकविमा कंपनीने सरसकट विमा देण्यास हरकत घेतली. इतकंच नाही तर पीकविमा कंपन्यांनी आधी विभागीय आयुक्त व नंतर राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे सरसकट विमा देण्यास हरकतीचे अपील केले होते. हे दोन्हीही अपील संबंधित यंत्रणांनी फेटाळून लावले.