Friday, January 17, 2025

अहिल्या नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा तडाखा, कांद्याचे मोठे नुकसान

नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने मोठा फटका बसला आहे. विशेषता: काढणीस तयार असलेल्या लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पावसात भिजल्यामुळे काढणीस आलेल्या कांद्याचा अक्षरशः ‘लाल चिखल’ झाला आहे. तालुक्यातील जेऊर पट्ट्यात सर्वाधिक नुकसान झाले असून लाल कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची लागवड करण्यात येत असते. लाल कांद्याच्या लागवडीनंतर सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या ढगाळ हवामान व धुक्यामुळे लाल कांद्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे लाल कांद्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पहावयास मिळत आहे. एकरी उत्पादन अर्ध्यापेक्षाही जास्त घटले आहे. लाल कांद्याला बाजार भाव चांगला मिळत असला तरी उत्पन्नात झालेल्या घटीचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर दिसून येत आहे.
तालुक्यातील जेऊर पट्टा हा कांदा उत्पादनासाठी राज्यात ओळखला जातो. या पट्ट्यात गुरुवार ( दि. ५ ) रोजी सायंकाळी तसेच शुक्रवारी सकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात काढून ठेवलेला लाल कांदा तसेच काढणीला आलेल्या लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचा लाल कांदा काढून विक्री झाला असला तरी अनेक शेतकऱ्यांचा अद्यापही कांदा शेतातच पडून आहे. अशा शेतकऱ्यांना मात्र अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याचे पहावयास मिळते. तालुक्यातील इतर काही भागात कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले असले तरी जेऊर पट्ट्यात मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पहावयास मिळत आहे.
काढणीला आलेल्या लाल कांद्याच्या गाभ्यात अवकाळी पावसाचे पाणी गेल्याने कांदा सडत आहे. तसेच भिजलेला कांदा तात्काळ बाजारात पाठवावा लागतो परंतु भिजलेल्या कांद्यास योग्य तो बाजार भावही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. लाल कांदा लागवडीनंतर विविध रोगांनी ग्रासला गेला होता. त्यामुळे कांद्याचे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून महागडी औषधांची फवारणी करण्यात आली होती. रोपांचीही पावसामुळे वाताहात झाली होती. मोठा खर्च करून लाल कांद्याचे उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला परंतु अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षावर मात्र पाणी फेरले आहे.

सुमारे दोन एकर कांदा काढून शेतात पडलेला आहे. अवकाळी पावसामुळे संपूर्ण कांदा भिजला आहे. भिजलेला कांदा सडण्याची शक्यता तयार झाली असून तात्काळ बाजारात पाठवावा लागणार आहे. परंतु भिजलेल्या कांद्याला बाजारात भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी मोठा आर्थिक अडचणीत सापडला आहे.
….. सुनील म्हस्के ( शेतकरी, जेऊर )

लाल कांदा काढणीला आलेला आहे. अवकाळी पावसामुळे कांदा भिजला असून शेतातच सडणार आहे. लाल कांद्यासाठी साधारणपणे एकरी ७० हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. हवामानातील बदलाचा फटका उत्पन्नाला बसला आहे. त्यातच अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. झालेला खर्च देखील वसूल होणार नाही. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
…… विकास म्हस्के ( शेतकरी, जेऊर)

पंचनामे करून मदत मिळावी
जेऊर पट्ट्यातील बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर, धनगरवाडी, डोंगरगण, पिंपळगाव माळवी, पिंपळगाव उज्जैनी, खोसपुरी, कापूरवाडी, शेंडी, उदरमल, पांगरमल परिसरात लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी.
……भिमराज मोकाटे ( माजी सरपंच, ईमामपूर )

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles