राज्यात सध्या चांगला पाऊस पडत असल्याचं चित्र आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा दिलाय. रेड अलर्ट अंतर्गत रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान, रायगड, कोल्हापूर आणि इतर दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केलाय.
आयएमडीच्या ताज्या अंदाजानुसार मुंबईत २२ जुलैपर्यंत पुढील चार दिवस हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. शहरात हवामानाची तीव्र स्थिती दिसणार नसली तरी, आजूबाजूचे जिल्ह्यांमध्ये तीव्र वादळाचा अंदाज आहे. कुलाबा येथे गेल्या २४ तासांत १०१ मिमी पाऊस पडला आहे. सांताक्रूझमध्ये गेल्या २४ तासांत ५०.२ मिमी पाऊस पडल्याचं समोर आलंय.
पुणे शहर आणि परिसरात आज हलक्या सरींची तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पावसाळ्यात शिवाजीनगर वेधशाळेत आतापर्यंत ३६२.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोकण,घाटमाथा आणि विदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. अद्यापही शहराला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.शिवाजीनगर येथे एक जूनपासून १८ जुलैपर्यंत ३६२.२ मिलिमीटर पाऊस पडतो. या दरम्यान शहरात सरासरी २५६.३ मिलिमीटर पावसाची नोंद होते. यंदा सरासरीपेक्षा १०५.९ मिलिमीटर पाऊस जास्त पडल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसते. त्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात धुवाधार पडलेल्या पूर्वमोसमी पावसाचा समावेश आहे.