मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया ठरविण्यासाठी नेमण्यात आलेली न्या. संदीप शिंदे समिती तात्काळ बरखास्त करावी, अशी मागणी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी केली. गेल्या दोन महिन्यांत देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याची मागणीही त्यांनी हिंगोली येथील ओबीसी एल्गार परिषदेत केली.
भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे जातनिहाय जनगणेनला अनुकूल आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही या मागणीला पाठिंबा आहे. जातनिहाय जनगणनेनंतरच अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींची शक्ती किती आहे, हे कळेल. बिहार जनगणना करू शकते, मग महाराष्ट्र का करू शकत नाही’’, असा प्रश्नही भुजबळ यांनी केला. सर्वांची जनगणना करा, सर्वांचे सर्वेक्षण करा आणि मगच मागासलेपण ठरवा, असेही भुजबळ म्हणाले. या वेळी प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, बबनराव तायवाडे, खासदार रामदास तडस, लक्ष्मण गायकवाड यांचीही भाषणे झाली.