बीडच्या गेवराई तालुक्यातील चकलंबा गावच्या शिवारात, वीज पडून 3 महिला ठार झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. चकलांबा शिवारात काही महिला खुरपणीचे काम करत होत्या. विजया राधाकिसन खेडकर (वय 45), शालन शेशेराव नजन (वय 55), लंकाबाई हरिभाऊ नजन (वय 42) अशी मृत महिलांची नावं आहेत. तर यमुनाबाई माणिक खेडकर या जखमी झाल्या आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या महिला शेतात खुरपणीच्या कामाला गेल्या होत्या. सायंकाळ झाली होती. हातातील काम आटोपून महिला घरी जाणार होत्या. मात्र अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी सुरक्षितस्थळी जाण्याआधीच वीजेने गाठलं. शिवारातचं वीज कोसळली यात 3 महिला जागीच ठार झाल्या आहेत. तर एक महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.