मराठा समाजाला आरक्षण दिल्या शिवाय राज्यसरकारची सुटका नाही. ज्या राज्यात मराठा समाजाला आरक्षणासाठी नोंदी सापडत नव्हत्या, तिथे आज २९ लाख नोंदी सापडल्या आहेत. अजूनही सापडणार आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. असा विश्वास मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी खोपोली येथे व्यक्त केला. सरकारने २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिले तर २५ डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, पण त्याआघी १ डिसेंबर पासून गाव तिथे साखळी उपोषणाची तयारी करा असे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले.
गेली सत्तर वर्ष पुरावे सापडत नव्हते आता प्रत्येक जिल्ह्यात पुरावे सापडत आहेत. ज्यात १८०५ पासून १९६७ पर्यंतच्या जुन्या नोंदीचा समावेश आहे. सरकार पुर्ण ताकदीने प्रयत्न करते आहे. पहीला अहवाल गेला आहे. दुसरा तयार होतो आहे. ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना लगेच दाखले वाटप सुरू झाले आहे. त्यामुळे आरक्षण दृष्टीक्षेपात आले आहे. त्यामुळे आता मागे हटू नका, एकजूट कायम ठेवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मराठ्यांच्या चेहऱ्यावर हसू पहायचे आहे. त्यामुळे जिवाची पर्वा न करता मी या लढ्यात उतरलो आहे. गेली ७० वर्ष आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाचे मोठं नुकसान झाले आहे. यापुढे होऊ देणार नाही. आरक्षणासाठी अशी संधी पुन्हा मिळणार नाही. कच खाऊ नका, आरक्षणासाठी एकजूट ठेवा, राजकारण बाजूला ठेवा, आत्महत्या करू नका, जाळपोळ करू नका, मी तुमच्या जिवावर लढतोय. सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ, शांततेच्या आंदोलनात ताकद मोठी आहे असेही ते म्हणाले.