अयोध्येत बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरांचा भाजपला राजकीय फायदा होणार असे गणित मांडले जात होते. विरोधकांकडून यासंबंधी आरोपही केले जात होते. मात्र, शिर्डीतील महायुतीचे पराभूत उमेदवार, माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी वेगळेच विश्लेषण केले आहे.
लोखंडे यांनी म्हटले आहे की, “अयोध्यामध्ये बांधण्यात आलेले राम मंदिर हेही एक माझ्या पराभवाचे कारण आहे. कारण शिर्डी लोकसभा मतदारसंघात रावणाला मानणारा आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहे. त्यांना राम मंदिर रुचले नाही,” असे लोखंडे यांनी कर्जत येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. लोखंडे मूळचे जामखेड तालुक्यातील आहेत. पूर्वी ते कर्जत-जामखेडमधून आमदार होते. त्यामुळे अलिकडेच त्यांनी कर्जतला भेट दिली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले. शिर्डीत आपला पराभव का झाला? काय कारणे असावीत? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांनी विचारला. लोखंडे म्हणाले, शिर्डी मतदारसंघात आदिवासी पट्टा आहे. तेथे रावणाला मानणारे बरेच आदिवासी आहेत. त्यांना राममंदिर रुचलेले दिसत नाही. त्याचा फटका मतदानाला बसला. याशिवाय त्या मतदारासंघात राजकीय गटतट मोठे आहेत. कारखानदारांच्या साम्राज्यांचे गटतट आहेत. त्यांच्यात कमालीचा संघर्ष आहे, त्यांच्या संर्घषात माझा बळी गेला, असे सांगून लोखंडे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय संघर्षामुळेही आपला पराभव झाल्याकडे लक्ष वेधले.