उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या गैरकृत्यांचं प्रायश्चित घेतलं आणि यापुढे लुटमार आणि माफियागिरी न करण्याचा संकल्प केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना पुन्हा महायुतीत घेतील, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केले. भाजपसोबत पुन्हा यायचं असेल तर उद्धव ठाकरे यांना मुस्लीम लांगुलचालन सोडून पुन्हा हिंदुत्ववादी विचारसरणी स्वीकारावी लागेल, असेही सोमय्या यांनी म्हटले. ते सोमवारी एबीपी माझाच्या ‘तोंडी परीक्षा’ या कार्यक्रमात बोलत होते.
सोमय्या यांनी म्हटले की, भ्रष्टाचाराचे नेते आमच्याकडे आल्याने ते पवित्र झाले असे मी म्हणणार नाही. पण मला एक निश्चित समाधान आहे की, गेल्या काही काळात जनतेमध्ये संदेश गेला की, एखाद्या राजकारण्यालाही शिक्षा होऊ शकते. अनेक राजकारण्यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त झाली, अनेकांना दंड झाला. काही जणांवर अद्याप कारवाई सुरु आहे, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
भ्रष्टाचारी नेते आमच्याकडे आल्यावर त्यांच्यावर वचक बसला आहे. यापूर्वी ते राजरोसपणे मोठी लूट करत होते, आता ती लूट करण्याचे प्रमाण मर्यादित असेल.