राज्याच्या राजकीय वातावरणात बदल झाल्याचा फटका भाजपाला बसला आहे, असं माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर त्यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
रावसाहेब दानवे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणूक झाल्या आणि त्यामध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. कार्यकर्ते खचून गेल्याचं दिसलं. त्यामुळं कार्यकर्त्यांना या अपयाशातून बाहेर काढण्यासाठी मी आता मतदारसंघाचा दौरा सुरु केला.ते म्हणाले, 13 तारखेला अंबड, पैठण आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व विधानसभेचा दौरा करणार. आगामी काळात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मी आता विभागवार बैठका देखील घेणार आहे.
दानवे म्हणाले की, या निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अपार कष्ट करून मेहनत घेतली. मात्र अपयश आलं. निवडणुकीत पराभवाची वेगवेगळी कारणे असतात. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच आम्ही कष्ट करून बाजी मारू.ते पुढे म्हणाले, ”कोणत्या एका व्यक्तीमुळे आमचा परभव झाला नाही. राज्याच्या वातावरणामध्ये अचानक बदल झालं आणि त्याचा फटका पक्षाला बसला. अब्दुल सत्तारच्या टोपी काढण्याच्या कार्यक्रमाला मी नक्की जाणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. माझा पराभव झाल्याचा आनंद सत्तारांना होत असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे.”
रावसाहेब दानवे म्हणाले, ”माझ्या मुलाच्या मतदारसंघात सुद्धा मला लीड मिळाली नाही. मग त्यात माझ्या मुलाने माझ्या विरोधक काम केलं, असं म्हणू का? त्यामुळे कुणालाही दोष देता येणार नाही.”