लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महायुतीत लोकसभेच्या नऊ जागांसाठी अजित पवार गट आग्रही आहे. राष्ट्रवादीकडील चार जागांव्यतिरिक्त आणखी पाच जागांची घटक पक्षांकडे मागणी केली आहे. अजित पवार गटातील संभाव्य उमेदवारांना मतदारसंघात चाचपणीच्या सूचना दिल्या आहेत. आणखी पाच जागांसाठी महायुतीतील घटक पक्षांकडे मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या चार जागा आहेत. बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार जागा आहेत. या जागा सोडून अजित पवार गट धाराशिव, परभणी, दक्षिण मुंबई, भंडारा गोंदिया, छत्रपती संभाजीनगर या पाच जागांसाठी आग्रही आहे. रायगडचा पुढचा खासदार भाजपचाच असेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. महायुतीला बाजूला ठेवून रायगडमधून धैर्यशील पाटील लोकसभा निवडणूक लढवण्याचे चंद्रशेखर बावनकुळे संकेत यांनी दिले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडील चार जागांव्यतिरिक्त आणखी पाच जागांसाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे
संभाव्य उमेदवारांची नावे
बारामती – सुनेत्रा पवार
सातारा – रामराजे नाईक निंबाळकर
रायगड – सुनिल तटकरे
शिरूर – शिवाजीराव आढळराव पाटील
दक्षिण मुंबई – काँग्रेसमधील बडा चेहरा
परभणी- राजेश विटेकर
भंडारा गोंदिया – प्रफुल्ल पटेल
धाराशिव – राणा जगजितसिंह
छत्रपती संभाजीनगर – सतीश चव्हाण
गेल्या अडीच तीन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेच्या तयारीला लागलेले पारनेरचे आमदार नीलेश लंके निवडणुक लढवणार का याची चर्चा सुरू असतानाच माध्यमातून आलेल्या चर्चेत अजितदादांनी महायुतीकडे एकूण 9 जागांची मागणी केल्याची चर्चा जोर धरत आहे. मात्र, सध्या माहिती मिळाल्यानुसार दक्षिण नगरचे नाव नसल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.