राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माढा मतदारसंघात सभा पार पडली. यावेळी एका तरूणानं लग्न होत नसल्यानं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना लिहिलेलं पत्र जयंत पाटील भर सभेत वाचून दाखवलं.
निवेदन देतो की, मंत्रीसाहेब राज्यातील प्रत्येक गावात गावात 40 ते 50 मुलं बिगर लग्नाची आहेत. त्याचं कारण बऱ्याचशा मुली नोकरीसाठी शहरात गेल्या आहेत. ती चांगली गोष्ट आहे. पण, त्यातील बऱ्याचशी मुली लग्नाच्या आहेत. त्यांना पगार भरपूर मिळतो. थोडे पैसे घरी आई-वडिलांना पाठवतात आणि उरलेल्या पैशांतून मौज-मजा करतात. इकडं गावाकडं मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. त्यामुळे मुलं व्यसनी आणि उद्विग्न झाली आहेत. तरी मुला-मुलींची लग्न झाल्याशिवाय महाराष्ट्रात कुठेही नोकरी मिळू नये. त्यामुळे खेडेगावातील बिगरलग्नाच्या मुलांची संख्या कमी होईल. ती खेडेगावातील मुलं कायमची आपल्या पाठिशी राहतील. तरी, आपल्या मर्जीनुसार अहवाल काढावा.
हे पत्र जयंत पाटील यांनी वाचून दाखवल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.