मुंबई: राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा स्थानिक स्वराज्य संस्थाप्रमाणेच सहकारी संस्थांनाही मोठा फटका बसू लागला आहे. राज्य सरकारच्या सततच्या हस्तक्षेपामुळे राज्यातील सुमारे ३९ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका गेल्या वर्ष-दीड वर्षापासून रखडल्या आहेत. आधी लोकसभा निवडणुकीचे कारण पुढे करीत या निवडणुकांना स्थगिती देणाऱ्या राज्य सरकारने पुन्हा एकदा पावसाचे कारण पुढे करीत या निवडणुकांना ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे या संस्थांच्या निवडणुका आता विधानसभा निवडणुकीनंतरच म्हणजेच पुढील वर्षी होण्याची शक्यता सहकार विभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.
राज्यात ३१ डिसेंबर २०२३ अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या ९३ हजार ३४२ सहकारी संस्थांपैकी ५० हजार २३८ संस्थांची निवडणूक पूर्ण झाली आहे. तर निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या सहकारी संस्थांची संख्या १० हजार ७८३ आहे. याशिवाय निवडणूक प्रक्रिया सुरूच झालेली नाही अशा २० हजार १३० तर चालू वर्षी निवडणुकीस पात्र ८ हजार ३०५ अशा एकूण ३८ हजार ७४० संस्थांची निवडणूक प्रक्रिया रखडली आहे.