शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी 5 हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे. सन 2023 मध्ये बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी त्याचबरोबर कापूस व सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. मात्र, महायुती सरकारने या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या निर्णयाची घोषणा लोकसभा निवडणुकीच्या आधीच केली होती. त्यानुसार, शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे, लवकरच शासनाच्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल. राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान 1000 रुपये तर 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5 हजार रुपये या प्रमाणे अर्थसहाय्य देण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. सदर अनुदानासाठी ई पीक पाहणी पोर्टल द्वारे पिकांची नोंदणी केलेले शेतकरी अनुदानास पात्र ठरणार असून, डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यात ही रक्कम वर्ग केली जाणार आहे. https://x.com/MahaDGIPR/status/1817951310857314552