राज्यात आज लोकसभेच्या 48 जागांसाठीच्या पाचही टप्प्यांचे मतदान संपले आहे. आता 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. यातच पाचव्या टप्प्याचे आज मतदान संपताच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भाविक पत्र लिहिलं आहे.
”लढाई अद्याप संपली नसून, आत्ता खरी लढाई सुरु झालेली आहे. २०२४ सालच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या सर्वांना संपूर्ण राज्य ढवळून काढून शरद पवार यांच्या विचारांचे सरकार आणायचे आहे. जे आपल्याला सोडून गेले, ते गेले. आता आपल्याला संपूर्ण संघटनेची पुनर्बांधणी पूर्ण करून सामान्य घरातील नेतृत्व सत्तेच्या स्थानांवर नेऊन बसवायचे आहे”, असं आवाहन त्यांनी आपल्या पत्रातून कार्यकर्त्यांना केलं आहे.
जयंत पाटील आपल्या पत्रात म्हणाले आहेत की, ”राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ या पक्षाचे आपण सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी हे पवारसाहेब यांच्या या कुटुंबाचे सदस्यच आहोत. गेले जवळपास एक वर्ष आपण सर्वजण एक फार मोठी लढाई लढत आहोत. ही लढाई आपल्या व्यक्तिगत लाभाची लढाई नसून ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मिता, विचार आणि मूल्यांची आहे. महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचा प्रयत्न हा काही आजचा नाही. तो गेले साडेतीनशे वर्ष होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाची बाजी लावली पण दिल्लीचे मांडलिकत्व स्वीकारले नाही.
पाटील म्हणाले आहेत, ”छत्रपती संभाजी महाराजांनी तर मृत्यू पत्करला मात्र ते दिल्लीसमोर झुकले नाहीत. पवारसाहेब हे याच महापुरुषांचे वैचारिक वारसदार आहेत, ते दिल्लीसमोर का झुकतील? काही अदृश्य शक्तींनी आपले पक्ष, चिन्ह काढून घेतले आहे. मात्र जे गेले त्याचा शोक करायचा नाही, मोठ्या ताकदीने समोर येणारी लढाई लढायची हाच आपला विचार आहे.”