राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश संपादन करत सर्वात मोठा पक्ष होण्याची किमया केली. अवघा एक खासदार म्हणून हिणवल्या गेलेल्या काँग्रेसने या लोकसभा निवडणुकीत अपक्ष विशाल पाटील यांच्यासह १४ खासदार निवडून आणल्याची किमया केली आहे. लोकसभेतील या मोठ्या विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसने विधानसभेची तयारी केली असून याबाबतची सर्वात मोठी घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
लोकसभेनंतर आता विधानसभेची तयारी करावी लागेल. आगामी विधानसभेत काँग्रेस पक्ष १५० जागा लढवण्याच्या विचारात आहे. लोकसभेत जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी साडे तीन महिने गेले. विधानसभेत हे टाळावे लागेल. त्यासाठी महिन्याभरात जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करावा लागेल. म्हणूनच आत्तापासूनच तयारी करावी लागेल, असे नाना पटोले यावेळी म्हणाले.
सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटीलही आमच्यासोबत येतील. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा मोठा फायदा झाला. या यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनाही बळ मिळाले. आम्ही हाच उत्साह घेऊन विधानसभेच्या मैदानात उतरु, असे नाना पटोले म्हणाले.