शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीविना सकाळी नऊपूर्वी भरणाऱ्या शाळांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली जाणार आहे. अनेक शाळा नियम करूनही सकाळी नऊपूर्वी शाळा भरवत असल्याने शिक्षण विभागाने हे पाऊल उचलले आहे.
राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. मात्र, अनेक शाळांनी या निर्णयाचे पालन केलेले नाही. शाळा सकाळी लवकर भरत असल्यास विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नसल्याचा मुद्दा मांडून राज्यपाल रमेश बैस यांनी शाळेची वेळ बदलण्याची सूचना केली होती. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला.
या निर्णयाची शैक्षणिक वर्ष २०२४-२५पासून अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. निर्णयाच्या अंमलबजावणीत अनेक तांत्रिक मुद्देही उपस्थित करण्यात आले. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचालकांनीही या निर्णयाला विरोध केला होता. शैक्षणिक वर्ष सुरू होताना काही शाळांनी वेळेत बदल केला आहे, तर काही शाळांनी पालकांशी चर्चा करून वेळ ठरवली. काही शाळांनी मात्र या निर्णयाचे पालन केलेले नाही. त्यामुळे शिक्षण विभागाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.